अहिल्यानगर । नगर सहयाद्री
अहिल्यानगर जिल्ह्यातील डोंगराळ भागातील गावांमध्ये प्रामुख्याने पाणी टंचाई जाणवत आहे. यामध्ये जिल्ह्यातील साधारण ६० गावे, वाड्या वस्त्या तहानलेली आहेत. प्रामुख्याने संगमनेर तालुक्यातील २३ हजार लोकसंख्येला सर्वाधिक १० टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून पुढील काही दिवसात हि भीषणता अधिक वाढण्याची शक्यता आहे.
एप्रिलच्या प्रारंभीच अहिल्यानगर जिल्ह्यात २६ हजार ७७५ नागरिकांना ११ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये संगमनेर, नगर, पाथर्डी तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाणी टँकर सुरू आहे. जिल्ह्यातील ६० गावे ४४ वाड्या- वस्त्यांवरील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यात १३ गावे आणि २१ वाड्यांमधील २३ हजार लोकांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेरमध्ये दहा टँकरच्या माध्यमातून ४२ खेपा मंजूर आहेत.
यात तालुक्यातील पठार भागातील गावांचा सर्वाधिक समावेश आहे. नगर तालुक्यातील ६ गावे व वाड्या-वस्त्यांवरील १ हजार ११४ नागरिकांना १ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकरमार्फत दहा खेपा मंजूर आहेत. पाथर्डी तालुक्यातील ९ गावे, ९ वाड्या-वस्त्यांवरील १ हजार ७४९ नागरिकांना १ टँकरने पाणीपुरवठा. सर्व टँकर हे शासकीय विभागाचे आहेत. संगमनेर तालुक्यात दोन विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यापैकी एक विहीर ही एका गावासाठी, तर एक विहीर ही टँकर भरण्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने हर घर जल योजना राबवली. त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या योजनेचे काम सुरू आहे. मात्र, अद्यापही ती योजना पूर्णत्वास गेली नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिणामी एप्रिल महिन्याच्या टंचाईत अवघड परिस्थिती ओढवली आहे. योजना पूर्ण झाली असती तर लोकांची तहान भागली असती.