अहिल्यानगर | नगर सहयाद्री
किरकोळ भांडणाच्या कारणावरून प्रियकराने आपल्या साथीदार प्रियेसीच्या गळ्यावर चाकूने वार करून तीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (16 जुलै) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नवनागापूर येथील आनंदनगर भागात प्रेमसंबंधातून हा प्रकार घडला आहे.
यासंदर्भात रंजना परशु रोकडे (वय 40 रा. काटवन खंडोबा, अहिल्यानगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची मुलगी प्रतिक्षा परशु रोकडे ही आकाश रघुनाथ शेरकर (रा. सप्रे मळा, सह्याद्री चौक, एमआयडीसी) याच्या सोबत गेल्या सात महिन्यांपासून आनंदनगर, नवनागापूर येथे भाड्याच्या घरात राहत आहे.
हे दोघे प्रेमसंबंधात असून लवकरच विवाह करण्याचे ठरवत होते. मात्र, घरगुती कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. प्रतिक्षा ही सकाळी 11 वाजता आपल्या आईला फोन करून रडत्या स्वरात सांगते की, आकाशसोबत किरकोळ वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात चाकूने तिच्या गळ्यावर वार करून तो घरातून निघून गेला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रतिक्षाला एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून ती सध्या आयसीयू मध्ये उपचार घेत आहे.
प्रतिक्षाने उपचारादरम्यान आईसमोर दिलेल्या माहितीनुसार, केवळ भांडी न घासल्याच्या कारणावरून आकाशने तिच्यावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले. पोलिसांनी आकाश शेरकर विरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.