नवी दिल्ली / वृत्तसंस्था –
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला मोठा धडा शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रात्री 8 वाजता देशवासीयांशी संवाद साधला. त्यानंतर मंगळवारी 13 मे रोजी पंतप्रधान मोदी मंगळवारी थेट वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेण्यासाठी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी जवानांसोबत संवाद साधला.
यावेळी हवाई दलाच्या जवानांनी सद्यस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या दौऱ्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जाऊन पाकिस्तानसह जगाला एक संदेश दिला की, संपूर्ण देश सैनिकांसोबत आहे.
आदमपूर एअरबेस देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे एअरबेस आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूर एअरबेस चर्चेत आले होते. पाकिस्तानकडून या एअरबेसवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. भारतीय हवाई दलाच्या जवानांनी हा हल्ला निकामी केला. पाकिस्तानकडून 10 मे रोजी ड्रोन आणि क्षेपणास्त्राद्वारे या एअरबेसवर हल्ला झाला होता. परंतु तो परतवून लावत भारताने पाकिस्तानच्या अनेक सैनिक ठिकाणांवर हल्ले केले. त्यामुळे या एअरबेसवरील जवानांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या संदर्भातील काही फोटो ‘एक्स’ वर शेअर करण्यात आले आहे. त्यात नरेंद्र मोदी यांनी लिहिली की, ‘मी सकाळी आदमपूर एअरबेसवर गेलो. त्या ठिकाणी हवाई दलातील सैनिकांची भेट घेतली. त्यांचे धैर्य, दृढनिश्चय आणि निर्भयता याला सॅल्यूट केले. त्यांच्यासोबत राहण्याचा एक अतिशय खास अनुभव होता. आपल्या देशासाठी आपल्या सशस्त्र दलांनी जे काही केले आहे त्याबद्दल भारत त्यांचा सदैव ऋणी राहील.’
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. यात 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला.