Disha Salian case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी नवीन अपडेट समोर आली आहे. तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोर्या आणि मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सतीश सालियन यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, दिशा तिच्या करिअरसाठी अत्यंत गंभीर होती आणि तिची आत्महत्या होऊच शकत नाही. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे भासवण्यात आले, मात्र ती एका मोठ्या कटाचा बळी ठरली आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली, आणि हे सत्य दडपण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित पुरावे नष्ट केले. शवविच्छेदन अहवाल 50 तास उशिरा तयार करण्यात आला, सीसीटीव्ही फुटेज गायब करण्यात आले आणि दिशाच्या मोबाईल लोकेशनचा कोणताही तपास करण्यात आला नाही. असे त्यांचे म्हणणे आहे.
8 जून 2020 रोजी दिशाच्या घरात पार्टी सुरू होती. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, त्याच रात्री आदित्य ठाकरे, त्यांचा अंगरक्षक, सूरज पांचोली आणि दिनो मोर्या अचानक त्या पार्टीत पोहोचले. दिशाला या पार्टीतील कोणत्या तरी गोष्टीबद्दल माहिती होती, जी उघड झाल्यास अनेकांना मोठा फटका बसला असता. त्यामुळे तिला जिवंत ठेवणे धोकादायक ठरल्यामुळे तिची हत्या करण्यात आली, असा धक्कादायक आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेत उल्लेख आहे की, दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे सतत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. तसेच, त्याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत त्यांनी 44 वेळा फोनवर संवाद साधला. यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती, संबंधित पोलीस अधिकारी आणि डॉक्टर यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग आणि लाई डिटेक्टर चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.