पुणे । नगर सहयाद्री
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना आयोजित कार्यक्रमात प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यक्रत्यांनी गोंधळ घातला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्यासाठी अजित पवारांचे भाषण सुरू होतात शेतकऱ्यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी बच्चू कडूंना न्याय द्या, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. मोठ्या संख्येने महिला शेतकरी देखील यावेळी उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील एका कार्यक्रमात संबोधित करत असताना प्रहारच्या काही कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आणि बच्चू कडू यांनी राज्य सरकारकडे केलेल्या १७ मागण्यांवरून घोषणाबाजी केली. तसेच बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कार्यक्रमात घोषणा दिल्या आणि अजित पवार यांचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असता अजित पवार यांनी बच्चू कडू यांच्या मागण्यासंदर्भात राज्य सरकारने काय भूमिका घेतली आहे याबाबत सांगितलं. अजित पवार म्हणाले की, बच्चू कडू यांच्या उपोषणासंदर्भात आणि त्यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील बच्चू कडू यांच्याबरोबर चर्चा केली.
तसेच बच्चू कडू यांच्याबरोबर देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केली. तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत एक समिती तयार करू, त्या समितीत बच्चू कडू यांचाही समावेश करू आणि त्यानंतर ती समिती जो अहवाल सरकारला देईल त्यानंतर राज्य सरकार योग्य तो निर्णय घेईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांना सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
बच्चू कडूंच्या जीवाला धोका!
माजी मंत्री बच्चू कडूंचं विविध मागण्यासाठी मागील सात दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चालली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे. बच्चू कडू यांना रुग्णालयात दाखल न केल्यास त्यांच्या जीवाला धोका आहे, असं अमरावतीचे तिवसा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी तहसीलदारांना पत्र लिहिले आहे.
काँग्रेसचा आंदोलनाला पाठिंबा!
सरकारने तात्काळ पावले उचलली नाहीत तर राज्यभर शेतकरी आंदोलन उभारण्याचा इशारा काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिला आहे. सरकारनं बच्चू कडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या तातडीनं पूर्ण कराव्या. अन्यथा शेतकऱ्यांच्या मागण्यांना घेऊन काँग्रेस राज्यभर आंदोलन उभं करेल. शेतकरी विरोधी महायुती सरकारचा निषेध केला जाईल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामाला सरकारच जबाबदार राहील, असा इशारा त्यांनी दिला आहे.
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; सरकारने दिलेले वचन पूर्ण न केल्यास 2 तारखेला मंत्रालयात घुसणार?
प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी सात दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात 90% मागण्या सरकारने मान्य केल्याचे कडू यांनी जाहीर केले. तसेच, दिव्यांगांचे मानधन वाढवण्याचे आश्वासन मिळाले असून, सरकारने दिलेले वचन पूर्ण न केल्यास 2 ऑक्टोबर 2025 रोजी मंत्रालयात घुसणार करू, असा कडक इशारा त्यांनी दिला.
बच्चू कडू यांनी 7 जून 2025 पासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, शेतमजुरांसाठी आर्थिक सहाय्य, आणि दिव्यांग-विधवांसाठी 6,000 रुपये मानधन यासह 14 मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. त्यांच्या बिघडत्या प्रकृतीमुळे तिवसा वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची गरज व्यक्त केली होती. 14 जून रोजी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनाचे पडसाद उमटवले होते.
सरकारचे आश्वासन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत कडू यांच्याशी चर्चा केली. कडू यांच्या मागण्यांसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन देण्यात आले. कडू यांनी सांगितले की, “90 टक्के मागण्या मान्य झाल्या असून, दिव्यांगांचे मानधन वाढवण्यास सरकार तयार आहे. मात्र, आश्वासनांची पूर्तता न झाल्यास 2 ऑक्टोबरला मंत्रालयात आंदोलन तीव्र करू.”
दरम्यान, बच्चू कडू यांनी आंदोलन स्थगित केले असले, तरी सरकारच्या आश्वासनांवर ते बारीक नजर ठेवणार आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांवरील ठोस निर्णयाची प्रतीक्षा आहे. कडू यांच्या या आंदोलनाने अमरावतीपासून पुण्यापर्यंत राजकीय वातावरण तापले असून, सरकारच्या पुढील कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या काय?
दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मासिक मानधन.
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आणि MSP वर 20% अनुदान.
7 एप्रिल 2025 च्या बैठकीनुसार शासन निर्णय.
युवकांना रोजगार किंवा सन्मानजनक वेतन, रिक्त जागा तातडीने भरणे.
ग्रामीण घरकुलांसाठी 5 लाख रुपये अनुदान.
शेतमजुरांसाठी अपघाती मृत्यू सहाय्य आणि स्वतंत्र मंडळ.
पेरणी ते कापणी MSP आधारित मजुरी, फळपिकांना 3:5 रेशो, दुग्ध व्यवसायाला MSP.
सेंद्रिय खतांना अनुदान.
मेंढपाळ आणि मच्छीमारांसाठी स्वतंत्र धोरण.
मनरेगा मजुरी 312 वरून 500 रुपये.
निवासी अतिक्रमण नियमित करणे.
दुधाला आधारभूत किंमत: गायीचे दूध 50 रुपये/लिटर, म्हशीचे दूध 60 रुपये/लिटर.
कांदा निर्यातबंदी 40 रुपये/किलो बाजारभावापर्यंत टाळणे.
ऊस पिकाला 4,300 रुपये/टन (1% रिकव्हरी) आणि 11% रिकव्हरीसाठी 430 रुपये FRP, स्वतंत्र रिकव्हरी यंत्रणा.
महसूलमंत्री बावनकुळेंनी दिले आश्वासन!
माजी मंत्री बच्चू कडू यांची राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी महायुतीचे सरकार सकारात्मक असून यासाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. या समितीच्या अहवालानंतर शेतकऱ्यांचे वर्गीकरण करून शासन निर्णय काढून मागण्या पूर्ण केल्या जातील. असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिले.