अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
प्रेमसंबंधातून तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा बनाव केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर तालुका पोलिसांच्या तपासातून उघडकीस आली आहे. सुरूवातीला अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात आता खून, कटकारस्थान आणि बनाव या गंभीर कलमांची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृत तरूणाच्या प्रेमप्रकरणातून सूड घेण्यासाठी ही हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे.
ही घटना 30 मे रोजी सायंकाळी टाकळी काझी (ता. अहिल्यानगर) शिवारातील हॉटेल रायबा समोर घडली. आदेश नंदू घोरपडे (वय 22, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) हा तरूण आणि त्याचा मित्र मोहित संतोष निमसे (वय 20, रा. रंगोली चौक, केडगाव) दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिल्यामुळे घोरपडे याचा मृत्यू झाला होता. मोहित निमसे याने या प्रकरणी 2 जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता, ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले.
यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी सांगितले की, आदेश घोरपडे याचे बीड जिल्ह्यातील दादेगाव (ता. आष्टी) येथील एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसर्या मुलासोबत ठरवले होते. याची माहिती घोरपडे याला मिळाल्यानंतर त्याने मोहित निमसे व इतर चार मित्रांसह 30 मे रोजी दादेगाव गाठले. तेथे मुलीच्या नातेवाईकांशी त्याचा वाद झाला. या वादानंतर घोरपडे व निमसे दुचाकीवरून पळून आले, तर त्यांचे इतर मित्र चारचाकीने परतले. यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी पाठलाग सुरू केला.
दरम्यान, घोरपडे व निमसे हे टाकळी काझी शिवारातून जात असताना पिकअप वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत घोरपडे जागीच ठार झाला. हा अपघात नसून पूर्वनियोजित कट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणात पोलिसांनी विश्वजीत सुभाष पोटे (वय 25) आणि संकेत बाळासाहेब बंडाले (वय 27, दोघे रा. दादेगाव) यांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू असून आणखी चार जणांचा या कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. या चार जणांचा शोध सुरू असल्याचे गिते यांनी सांगितले.