मुंबई। नगर सहयाद्री:-
महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत लाभार्थींना सप्टेंबर महिन्याचा ₹१५०० चा हप्ता जमा झाला आहे. आता सर्वांचे लक्ष आहे ऑक्टोबरच्या हप्त्याकडे. दिवाळीचा सण समोर असल्याने महिलांना अपेक्षा आहे की यंदाची भाऊबीज लाडक्या बहिणींसाठी खास ठरणार आहे.
यापूर्वीही सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शासनाने हप्त्यांचे वितरण केल्याचे उदाहरण आहे. त्यामुळे यंदाही दिवाळीच्या मूहूर्तावर ऑक्टोबरचा हप्ता लाभार्थींना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तथापि, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेत अनेक महिन्यांचे हप्ते वेळोवेळी लांबणीवर गेलेले पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर महिलांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ऑक्टोबरचा ₹१५०० चा हप्ता मिळणार की नाही?
योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी काही ठराविक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. ज्या महिलांनी नियमबाह्य अर्ज केले होते, त्यांच्या अर्जांची छाननी करून ती अर्ज फेटाळण्यात आले आहेत. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात आली आहे. त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
यासोबतच आता KYC (नो युअर कस्टमर) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ज्यांनी KYC अद्याप पूर्ण केलेले नाही, त्यांचा हप्ता थांबवला जाऊ शकतो. महिलांना नोव्हेंबरपर्यंत KYC करण्याची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत KYC न केल्यास नोव्हेंबरनंतर हप्ता थांबण्याची शक्यता आहे.
राज्यभरातील कोट्यवधी महिलांचे भवितव्य या योजनेवर अवलंबून आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शासनाकडून याबाबत स्पष्ट भूमिका घेणे अपेक्षित आहे.