अमरावती / नगर सह्याद्री –
पुणे आणि नाशिकनंतर आता अमरावतीमध्येही हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वरुड तालुक्यातील आमनेर येथे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पती, दीर आणि एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करत अमरावती पोलिसांनी काही तासांतच तिघांनाही अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे २०२२ मध्ये अब्दुल फईम अब्दुल रहीम या युवकाशी लग्न झाले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत असतानाच, काही महिन्यांनी तिच्यावर हुंड्याच्या नावाखाली छळ सुरू झाला. लग्नात ‘आंधण’ कमी दिल्याचा राग पती आणि सासरच्यांना होता. यामुळे पीडित विवाहितेला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता.
या अतिरेकाला कंटाळून पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी मिळताच तिचे वडील अकबर खान यांनी वरुड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पती अब्दुल फईम, दीर अब्दुल नदिम आणि एका महिलेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
पोलिसांनी गंभीरतेने कारवाई करत तिघांना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. राज्यात वाढत चाललेल्या हुंडाबळीच्या घटनांमुळे सामाजिक अस्वस्थता निर्माण झाली असून, महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राज्यात एकापाठोपाठ एक हुंडाबळीच्या घटना
दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीने हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाच राज्यात एकापाठोपाठ एक हुंडाबळीच्या घटना समोर येत आहेत. पुण्यानंतर नाशिक आणि आता अमरावतीमध्ये विवाहितीने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे.