अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात चार सख्ख्या बहिणींवर अत्याचार झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अटकेत असलेला आरोपी बजरंग साळुंखेने सहा महान्यांपूर्वी आपल्या मेव्हण्याची हत्या करून मृतदेह घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मृतदेह उकरून काढत त्याच जागेवरच शवविच्छेदन केले. या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे.
आई-वडील विभक्त झाल्याने दूरचा नातेवाईक असलेल्या बजरंग साळुंखे याच्याकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या सख्ख्या ४ सख्ख्या बहिणींवर त्याने आणि त्याच्या मेव्हण्याने बलात्कार केल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणी राहुरी तालुक्यातील दवणगाव येथे राहणारा आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली होती. तर बेपत्ता आरोपी आणि साळुंखेचा मेव्हणा निलेश सारंगधर याचा शोध पोलिस घेत होते.
चौकशी दरम्यान आरोपी बजरंग साळुंखेने ६ महिन्यांपूर्वी मेव्हणा निलेश सारंगधर याची गळा दाबून हत्या केल्याची आणि पत्नीच्या मदतीने मृतदेह दवणगाव येथील घराजवळ पुरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंखेला घटनास्थळी नेत मृतदेह उकरून काढला आणि जागेवरच शवविच्छेदन केले. पोलिस बलात्काराच्या गुन्ह्याचा तपास करत असताना हत्येचा उलगडा झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
चारही पीडित मुली नाशिक जिल्ह्यातील असून त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर ३ मुली अल्पवयीन आहेत. सज्ञान झालेल्या मुलीचे चार महिन्यांपूर्वी लग्न झाले. ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आल्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अल्पवयीन मुलींपैकी एक १६, दुसरी १४ आणि तिसरी १० वर्षांची आहे.
मोठ्या बहिणीच्या तक्रारीवरून आरोपी बजरंग साळुंखे आणि इतर दोन आरोपी आणि त्यांना मदत करणारी एक महिला अशा ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बजरंग साळुंखे आणि त्याच्या बायकोला अटक केली. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.