आमदार काशीनाथ दाते | तक्रारींचा पाऊस | तातडीने निराकारण करण्याचे आश्वासन
पारनेर | नगर सह्याद्री:-
पारनेर शहरातील इंदिरा भवन येथे आमदार काशिनाथ दाते यांच्या नेतृत्वात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. या जनता दरबाराला शेकडो नागरिकांनी आपल्या विविध समस्या घेऊन हजेरी लावली. नागरिकांच्या प्रश्नांना ऐकून घेऊन त्याचे तातडीने निराकरण करण्याचे आश्वासन आमदार काशिनाथ दाते यांनी दिले.
दरमहा एक दिवस जनता दरबाराचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या जनता दरबारात नागरिकांनी महसूल विभाग, पुरवठा विभाग, भूजमापन विभाग, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेऊन अनेक प्रश्न तात्काळ माग लावले. तहसीलदार गायत्री सौंदाणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दयानंद पवार, पारनेर पोलीस निरीक्षक समीर बावरकर, सुपा पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तत्परता दाखवली.
जनता दरबारात महायुतीच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राहुल पाटिल शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, ज्येष्ठ नेते वसंत चेडे, जिल्हा बँक संचालक प्रशांत दादा गायकवाड, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा सुषमाताई रावडे, युवक अध्यक्षा अपर्णा खामकर, संदीप कपाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासनाशी समन्वय साधण्याचे काम केले.
आमदार काशिनाथ दाते यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांवर झालेला अन्याय दूर करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून निराकरण करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक महिन्याला जनता दरबार आयोजित करून आम्ही जनतेच्या जवळ राहू, असे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी विश्वास निर्माण झाला असून, अनेकांनी आमदार दाते यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. हा जनता दरबार यशस्वी ठरला असून, येत्या काळातही अशा उपक्रमांद्वारे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार दाते आणि महायुतीचे कार्यकर्ते कटिबद्ध असल्याचे दिसून आले. या दरबारामुळे पारनेर तालुक्यातील नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करणार
नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रशासनाच्या माध्यमातून तातडीने निराकरण करणे हा जनता दरबाराचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक महिन्याला असा दरबार आयोजित करून आम्ही जनतेच्या जवळ राहू आणि त्यांच्यावर झालेला कोणताही अन्याय दूर करण्यासाठी प्रयत्न करू. आज शेकडो नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या, त्यापैकी अनेक प्रश्न माग लावले असून, उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधला जाईल.
– आमदार, काशीनाथ दाते