श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील वागजोई चौकात माजी सरपंच पोपटराव आबा पाचपुते यांच्या मालकीच्या व्यापार संकुलाला मंगळवार, दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. या आगीत आठ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सदर आगीत हॉटेल स्वराज, नंदिनी साडी सेंटर, के. के. पेढा, वाघमारे भेळ सेंटर, महाराष्ट्र बेकरी, के. के. पानवाला, सत्कार पानवाला, आणि सानवी मिल्क अँड प्रॉडक्ट्स ही दुकाने आगीत भस्मसात झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले होते. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले, त्यानंतर नगरपालिकेचे अग्निशामक दलही दाखल झाले. संयुक्त प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात आली, परंतु तोपर्यंत सर्व दुकाने जळून खाक झाली होती.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रथम पोलीस कॉन्स्टेबल कुटे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पीएसआय लिमकर, पोलीस कॉन्स्टेबल चोभे व तरटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाकडून मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसात दोन घटना
कालच श्रीगोंदा शहरातील मांडवगण रोडवरील‘एस संकल्प मॉलला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली होती. नवरात्री व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्टॉक केलेला संपूर्ण माल जळून खाक झाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. ही आगीची घटना ताजी असतानाच, आज पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.