अहिल्यानगर। नगर सहयाद्री:- माजी महापौर आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांच्यावर आर्थिक कारणावरुन डांबून ठेवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रवींद्र रामराव शेळके यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात मच्छिंद्र झेंडे, अभिषेक कळमकर, लालू उर्फ अभिषेक जगताप, तसेच एक महिलेसह अनोळखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील आर्थिक कारणावरुन वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवून रवींद्र रामराव शेळके यांना मारहाण करून त्यांच्याकडून विविध स्टॅम्पवर बळजबरीने सह्या घेण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. रवींद्र रामराव शेळके हा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याकडे दहा वर्षापासून चालक म्हणून कामाला होते. मात्र कळमकर यांच्याशी आर्थिक कारणावरुन वाद झाल्याने रवींद्र शेळके याने दोन वर्षापासून चालक म्हणून असलेली नोकरी सोडून दिली होती. सहा महिन्यापूव सुद्धा रवींद्र रामराव शेळके यांच्या अंगाराव गाडी घालून मारण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप शेळके यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली असल्याचे सांगितले.
12 मे रोजी रवींद्र रामराव शेळके यांचे नगर सोलापूर रोडवरून पांढऱ्या व रंगाच्या टोयाटो कंपनीच्या वाहनातून आलेल्या लोकांनी अपहरण करून त्यांना चिखली या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. तसेच एका महिले बरोबर बळजबरीने फोटो काढून घेण्यात आले आणि त्यानंतर काही नोटरी आणि कागदपत्रांवर बळजबरीने सह्या घेतल्या असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या पासून आपल्याला आणि कुटुंबाला धोका असल्याने शेळके यांनी केली संरक्षणाची मागणी केली आहे. याबाबत माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
अहिल्यानगरमध्ये पुढील तीन दिवस पाऊस
अहिल्यानगरच्या काही भागात 19 आणि 21 मे रोजी अर्थात पुढील दोन दिवस वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनकडून करण्यात आलं आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रान्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या किंवा लोंबकळणाऱ्या केबल्स पासून दूर रहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणाऱ्या दूर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज) आजूबाजूला थांबू नये. मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे. धरण व नदीक्षेत्रामध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. धरणाचे पाण्यात वा नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. वादळी वारा, पाऊस व गारपीट यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. दरम्यान, वादळी वारे, वीज, पाऊस आणि गारपीट यांपासून स्वत:सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्र. 1077 (टोल फ्री), 0241- 2323844 अथवा 2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.