अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण योगदान देणारे ज्येष्ठ नेते अरुणकाका बलभीम जगताप यांचे आज, २ मे २०२५ रोजी दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनानंतर राज्यातील अनेक नेत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.
ते म्हणाले, माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील.
त्यांच्या निधनाचा धक्का पचवण्याची शक्ती त्यांचे पुत्र आमदार संग्राम जगताप, संपूर्ण जगताप कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांना मिळो, अशी प्रार्थना करतो. आम्ही सर्वजण जगताप कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत अरुणकाकांच्या आत्म्यास सद्गती लाभो, ही प्रार्थना., अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली आहे.