परभणी / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. एकेकाळचे राजकीय शत्रुत्व असणारे अनेक मतांबाबर आता एकाच व्यासपीठावर दिसत आहेत. दरम्यान आता नुकतेच रासपचे नेते महादेव जानकर हे महायुतीमध्ये सामील होत परभणीतून लढण्यास सज्ज झाले. भारतीय जनता पक्ष मित्रपक्षांचा वापर करुन फेकून देतो अशी टीका करणारे राष्ट्रीय जनता पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर नंतर महायुतीत गेले.
भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्यानं जानकरांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांनी माढ्याची जागा रासपला सोडण्याची तयारी दर्शवली होती. पण नंतर जानकर अचानक महायुतीच्या नेत्यांच्या भेटीला गेले. फडणवीस यांनी समेट घडवून आणला. त्यानंतर जानकरांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. महायुतीनं त्यांना एक जागा देण्याची तयारी दर्शवली.
महादेव जानकरांनी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय का घेतला यामागची कारणं सांगितली. ‘मी सर्वप्रथम शरद पवार साहेबांचे आभार मानतो. त्यांनी माढ्याची जागा देण्याची तयारी दर्शवली होती. पण महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्षांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. मी मविआकडे तीन जागा मागितल्या होत्या. माढा, परभणी, सांगली या जागांसाठी मी आग्रही होतो. या तीन जागा मविआतील तीन घटक पक्षांकडे होत्या. पण पवार वगळता अन्य कोणीही मला प्रतिसाद दिला नाही. माझ्याशी चर्चा केली नाही,’ असं जानकरांनी सांगितलं.
महायुतीकडे मी दोन जागा मागितल्या. माढा आणि परभणीची मागणी केली होती. त्यातील माढ्याच्या जागेसाठी भाजपनं आधीच उमेदवार जाहीर केला होता. परभणीची जागा सोडण्याची तयारी त्यांनी दर्शवली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यात असलेली परभणीची जागा आम्हाला देण्यात आलेली आहे. यासंदर्भात माझी शिंदे, फडणवीस, अजित पवारांशी चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत माझ्या ५० टक्के मागण्या पूर्ण केल्या. पण मविआतून केवळ शरद पवारांनी माझ्याशी चर्चा केली. मला एक जागा सोडण्याची तयारीही दर्शवली होती. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, असं जानकर म्हणाले.