संगमनेर । नगर सहयाद्री:-
दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या कामगारांना सातत्याने काम लावत डांबून ठेवण्यात आले होते. यात बालकामगारांचा देखील समावेश होता. या कामगारांना डांबून ठेवण्यात आल्याचा प्रकार होता. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना आज सकाळी प्राप्त तक्रारीवर प्रशासनाने तत्परतेने कारवाई केली असून ३८ वेठबिगारांसह ३१ बालकामगारांची मुक्तता करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील शेंडेवाडी, साकूर, पिंपळगाव, कवटे मलकापूर व कर्जुले पठार येथील दगडखानीवर काम करणाऱ्या ३८ वेठबिगार कामगार व ३१ बालकामगारांची मुक्तता करण्यात आली. मुक्तता करण्यात आलेल्या ३८ वेठबिगार कामगारांत २२ पुरूष व १६ महिला कामगार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आलेल्या मोहिमेत कामगार अधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासह १० ते १२ जणांच्या तीन पथकांच्या माध्यमातून ही धडक कारवाई करण्यात आली.
मुक्तता करण्यात आलेले सर्व वेठबिगार व बालकामगार पालघर जिल्ह्यातील असून तहसीलदारांच्या स्वाक्षरीने बंधमुक्तता प्रमाणपत्र देऊन पोलीस संरक्षणात त्यांना पालघर येथे रवाना करण्यात आले. दरम्यान, ठेकेदार राठोड यांच्याविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायदा व वेठबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.