मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यातील पाच ज्योतिर्लिंगांच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ या पाच पवित्र तीर्थक्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रथमच पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय राज्याच्या धार्मिक पर्यटन, स्थानिक अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक वारशाच्या संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
भीमाशंकर (पुणे) – व्ही. राधा (अतिरिक्त मुख्य सचिव, सामान्य प्रशासन विभाग), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर) – बी. वेणुगोपाल रेड्डी (अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग), त्र्यंबकेश्वर (नाशिक) – सौरभ विजय (प्रधान सचिव, वित्त विभाग), औंढा नागनाथ (हिंगोली) – रिचा बागला (प्रधान सचिव, वित्त विभाग), परळी वैजनाथ (बीड) – आप्पासाहेब धुळाज (सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग) हे अधिकारी नियमितपणे आपल्या संबंधित तीर्थक्षेत्रातील विकासकामांचा आढावा घेऊन, त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करणार आहेत.
या योजनांमधून प्रवासी सुविधा, रस्ते विकास, पाणी व स्वच्छता, सौंदर्यीकरण, भक्तनिवास व इतर पूरक प्रकल्प राबवले जाणार आहेत. राज्य शासनाने प्रत्येक ज्योतिर्लिंगासाठी स्वतंत्र उच्चपदस्थ अधिकारी नेमण्याचा निर्णय प्रथमच घेतला असून, या निर्णयामुळे कामांना वेग मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधांचाही मोठा लाभ होणार आहे.
5 ज्योतिर्लिंगाच्या विकासासाठी मंजूर निधी
भीमाशंकर – 148.37 कोटी
घृष्णेश्वर – 156.63 कोटी
त्र्यंबकेश्वर – 275 कोटी
औंढा नागनाथ – 15.21 कोटी
परळी वैजनाथ – 286.68 कोटी