Politics News Today: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी राजभवनमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांना स्थान देण्यात आले. त्यानंतर आता भुजबळ यांना अन्न आणि नागरी पुरवठा खाते जाहीर करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी मार्चमध्ये आपल्या अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रिक्त झालेले हे खाते भुजबळांना सोपावण्यात आले आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याचा पदभार होता. मात्र मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे खाते अजित पवारांकडे होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर तेच खाते भुजबळ यांच्याकडे दिले जाईल असे कयास बांधले जात होते. राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर भुजबळांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासून ते नाराज होते. आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखविली होती. भुजबळ हे अजित पवार गटातील एक मोठा ओबीसी चेहरा मानले जातात.
अजित पवारांनी मंत्रिमंडळात डावलल्यानंतर छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती. त्या वेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये छगन भुजबळ यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. मात्र नंतर हे खाते धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांच्याकडे या खात्याचा चार्ज होता. आता अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
खातेवाटप झाल्याचा फोन येताच भुजबळ लगेचच मुंबईला रवाना झाले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले की, सरकारी आदेश निघाल्याचे मला आताच कळले. मी लगेचच मुंबईला जात असून चार्ज घेत आहे. आमचे मुख्य अधिकारी, सचिव या सगळ्यांची बैठक देखील घेत आहे. त्यांचे काय प्रश्न आहेत? यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, माझा प्राधान्यक्रम हाच आहे की माझ्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे. कोरोना काळातही दोन वर्ष ज्यावेळी सगळे लोक घरात बसले होते, त्यावेळी मी शेवटच्या गावापर्यंत प्रत्येक दुकानात अन्य धान्य पोहोचवले, कुठेही तक्रार येऊ दिली नाही. रात्रंदिवस आमच्या विभागाने काम केले, आता सुद्धा आमचे हेच ध्येय आहे की, एक तर पुढे घोटाळा होता कामा नये.
दुसरे संपूर्ण गोरगरिबांना चांगल्या प्रतीचे अन्नधान्य मिळावे. जिथे कुठे राज्यात मागास भटके असतील, त्यांना रेशन कार्ड तात्काळ पुरवणे आणि धान्य वाटप करणार आहे. शिवभोजनच्या काही तक्रारी असतील, तर त्या सोडवाव्या लागतील. हे माझेच खात होते, माझा मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने ते धनंजय मुंडे यांच्याकडे गेले, आता धनंजय मुंडे यांना लांब राहावे लागले. आता पुन्हा माझ्याकडे हे खाते आले, असे त्यांनी म्हटले.