संगमनेर । नगर सहयाद्री:-
आपल्या सर्वांच्या योगदानामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. लोकांसाठी काम करणारे हे सरकार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतक-यांच्या पाठीशी उभे राहून महायुती सरकारने केवळ घोषणा नव्हे तर मदत देण्याची अंमलबजावणी केली आहे. येणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीतही तेवढ्याच जोमाने काम करुन, महायुतीला विजयी करण्यासाठी कटीबध्द होण्याचे अवाहन जलसंपदा तथा पालकमंत्रीराधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न् झालेल्या या मेळाव्यास शिवाजीराव जोंधळे, कैलास तांबे, रामभाऊ भूसाळ, निवृत्ती सांगळे, मच्छिंद्र थेटे, संतोष रोहोम, आर.डी कदम, रंगनाथ उंबरकर, भाऊ गायकवाड, विनायकराव बालोटे, ज्ञानदेव वर्पे, सौ.कांचन मांढरे, अॅड.रोहीणी निघुते आदि पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील विधानसभा निवडणूकीत आपण सर्वांनी दिलेल्या पाठबळामुळेच शिर्डी विधानसभा मतदार संघात ऐतिहासिक विजय मला मिळाला. आपल्या सर्वांच्या योगदानामुळेच राज्यातही महायुती सरकार सत्तेवर आले. महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळत आहे. नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन, शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली.
तालुक्यातील शेतक-यांना २२ कोटी २० लाख रुपयांची मदत उपलब्ध झाली असून, कालच्या मंत्रीमंडळ बैठकीतही ११ हजार कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, शिर्डी मतदार संघातही विकासाची प्रक्रीया कुठेही कमी झालेली नाही. ग्रामस्थ आणि कार्यकर्ते सुचवतील त्याच पदध्दतीने विकास कामे होत आहेत.
निळवंडे उजव्या कालव्याची प्रतिक्षा अनेक वर्षांची होती. या प्रश्नाची सोडवणूक करुन, शेतक-यांना पाणी देता आल्याचे मोठे समाधान व्यक्त करुन, प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या नूतणीकरणासाठी दिडशे कोटी रुपयांची उपलब्धता करुन दिली असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. शिर्डी मतदार संघातील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची सुरुवात गतीने होत असून, अनेक उद्योजक त्या ठिकाणी येवून आता उद्योगाची उभारणी करु लागले आहेत. अतिशय कमी कालावधीत शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये या भागातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी बोलताना शाळीग्राम होडगर यांनी गट आणि गणाचे नियोजन कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच सुरु करण्याचे आवाहन करुन, नागरीकांच्या भेटीगाठी घेण्यासाठीही गावपातळीवर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे सुचित केले. संतोष रोहोम यांनी आपल्या भाषणात ना.विखे पाटील जो उमेदवार देतील त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही आम्ही घेवू. त्यांच्या नेतृत्वाखालीच संगमनेर तालुक्यात परिवर्तन होवू शकले आहे. अगामी निवडणूकीतही हे परिवर्तन अधिक मोठे होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या मेळाव्यात संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, वाघापुरचे माजी उपसरपंच विनोद घोलप, अमृत दुध संस्थेचे संचालक रामभाऊ शिंदे, वाघापुर सोसायटीचे संचालक साहेबराव शिंदे, साईराम राहाणे, शारदा पतसंस्थेचे नानासाहेब शिंदे, दिपक पानसरे, बाबासाहेब शिंदे, संदिप शिंदे, जोर्वे युवक कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ बलसाने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री विखे पाटील यांनी स्वागत करुन, अभिनंदन केले.



