अहिल्यानगर | नगर सह्याद्री
केडगाव उपनगराचा गेल्या एक महिन्यापासून विजेचा लपंडाव चालू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहे. विद्युत विभागाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री-अपरात्री लाईट जात असल्यामुळे नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू असून विद्युत विभागाने अडथळा ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या पावसाळ्यापूव तोडणे गरजेच्या होत्या, मात्र कुठल्याही उपयोजना झालेल्या दिसत नाही. येत्या आठ दिवसात केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी माग लावावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा सहाय्यक अभियंता राहुल शिलावत यांना माजी सभापती मनोज कोतकर यांनी निवेदनाद्वारे दिला.
माजी सभापती मनोज कोतकर म्हणाले की, केडगाव उपनगरामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आली आहे. मात्र विद्युत विभागाच्या ट्रांसफार्मरची संख्या कमी आहे. दोन पोल मधील अंतर जास्त असल्यामुळे तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे देखील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तसेच या परिसरामध्ये शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने राहत असल्यामुळे त्यांची विजेवरची उपकरणे चालत नसल्यामुळे त्यांचे देखील हाल होत आहे. व्यवसाय करणाऱ्या नागरिकांची लाईट अभावी मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
विद्युत विभागाचा दूरध्वनी क्रमांक कायमस्वरूपी बंद असतो, त्यामुळे नागरिकांनी तक्रार कुठे करायची तसेच कर्मचारी अपुरे असल्यामुळे झालेला प्रॉब्लेम तातडीने सोडवता येत नाही. त्यामुळे केडगावकरांना अक्षरशः एक-एक दोन-दोन दिवस अंधारात काढावी लागतात. विद्युत विभागाने येथे आठ दिवसात केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न न सोडविल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल. असा इशारा माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला आहे.