पारनेर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर पारनेरमधील जातेगाव फाट्यावरील एका युटर्नवर सागर सुरेश धस यांच्या गाडीने हॉटेल चालक नितीन शेळके यांना उडवले. यात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात जातेगाव फाटा, पारनेर तालुक्यामध्ये रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडला. परंतु या घटनेनंतर एक महत्वाचा मुद्दा समोर आला. तो म्हणजे महामार्गावरील याच जागेवर, याच ठिकाणी झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 4 जण शेळके कुटुंबातीलच होते.
या अपघातानंतर कुटुंबियांनी संबंधित विभागावर गंभीर आरोप केले आहेत. या ठिकाणी स्पीड ब्रेकर किंवा धोक्याचा सूचना फलक लावण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, प्रशासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे आतापर्यंत 11 पेक्षा अधिक निष्पाप जीव गमवावे लागले आहेत. आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होईल? असा संतप्त सवाल शेळके कुटुंबियांनी केला आहे.
प्रशासनाने कार्यवाही करावी
या ठिकाणी प्रशासनाने विविध गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. तसेच धोक्याचा सूचना फलक लावण्याची मागणी देखील होत आहे. या ठिकाणी होणाऱ्या अपघातांची संख्या पाहता प्रशासनाने योग्य ती खबरदारीच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे
पोपट शेळके, दत्तात्रय शेळके, अशोक शेळके, संपत शेळके, दिलीप वाखारे, रामदास गाडीलकर, बाळासाहेब तरटे, प्रभू गाडीलकर, सुनिल नवले, आईशा शेख, जालिंदर पळसकर