मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर दिसणार, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एका ट्विटद्वारे ही मोठी माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्रातील शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल. त्यासोबतच, त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्र फोटोही पोस्ट केला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू ५ जुलै रोजी होणाऱ्या या मोर्च्यात एकत्र सहभागी होणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
या मोर्च्याचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आलं आहे. सुरुवातीला मनसेने शिवसेना (ठाकरे गट)ला एकत्र मोर्चा काढण्याचा प्रस्ताव दिला होता. वेगवेगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे नव्हे तर सामूहिक लढा द्यावा, ही मनसेची भूमिका होती. राज ठाकरे यांनी याआधीच सांगितलं होतं की, “आपण सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करू.” याच दरम्यान, संजय राऊतांचं हे ट्विट आलं आणि एकत्र मोर्च्याच्या चर्चांना नवी धार मिळाली.
या मोर्च्याचं आयोजन ५ जुलै २०२५ रोजी करण्यात आलं आहे. सुरुवातीला ६ जुलै ही तारीख घोषित करण्यात आली होती, मात्र नंतर ती एक दिवस आधी म्हणजेच ५ जुलै निश्चित झाली. या दिवशी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर येतील, अशी शक्यता आहे. राजकीय वर्तुळात गेल्या अनेक महिन्यांपासून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांना जोर होता.
या मोर्चाच्या निमित्ताने ते एकत्र आले, तर याला राजकीय पुनर्मिलनाची सुरुवात मानली जाईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या मोर्च्यात फक्त ठाकरे बंधूच नाही, तर इतर अनेक राजकीय पक्षांचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या अस्मितेसाठी होणारा हा मोर्चा अधिक व्यापक आणि प्रभावशाली ठरू शकतो.